Rishi

 Rishi.jpg

 

श्रीअरविंद-विचार-दर्शन-माला

पुष्प ४ थें

 

ऋषि

 

 

श्रीअरविंद

श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी – २

 

पान क्र. ०१

 

प्रकाशक :

संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी – २

 

अनुवादक :

गजराज

श्रीअरविंद आश्रम

 

मुद्रक :

विकास मुद्रा-मंदिर.

धरमपेठ नागपूर – १

 

पान क्र. ०२

 

ऋषि

 

(अतिप्राचीन काळीं या पृथ्वीवर आर्क्टिक महादेशाचेंहि अस्तित्व होतें. त्या काळांतली ही कथा आहे. राजा मनु ज्ञानप्राप्तीसाठी, ध्रुवप्रदेशांतील एका ऋषीजवळ गेला. ऋषींनीं त्याला बराच काळ ज्ञानाच्या विविध क्षेत्रांत हिंडवून शेवटीं मानवाच्या मुख्य ज्ञातव्य विषयाच्या ज्ञानाचा उपदेश केला.)

मनु : पूर्वकालीन पर्वतशिखरांवर, बाह्यशून्य व विशाल होऊन, ध्यानावस्थेंत प्रसुप्त अशा आत्म्याच्या विशुद्ध चिरंतन आनंदांत विरघळून गेलेल्या हे स्वप्नद्रष्ट्या महर्षे ! माझी वाणी या नीरव एकांतांत प्रविष्ट होऊन आपल्या घोर निद्रेचा भंग करो. ऐका, स्वत:च्या या विशाल,

पान क्र. ०३

 

शुभ्र, शीतल शय्येवर पडणाऱ्या हिमपाताचें तीक्ष्ण दर्शनसुद्धां आपल्या सजीव अवयवांना असह्य होत नाहीं. जीवन-मरणावरील आपल्या दृष्टिकोणाची विशालता या असीम नभोमंडलाहूनही अधिक विस्तृत आहे. आपल्या मनाची शांतता आणि तेज त्याच्या शून्यतेहूनही पुढें गेलेलें आहे आणि आमचें मन प्रकाशाचें विसर्जन करून अंधभावानें कर्म करतें आहे.

ऋषि : तुझ्या दृष्टींत प्रभुत्व दिसतें आहे. तुझी चाल सम्राटासारखी वाटते. सूर्यासारख्या तेजस्वी अशा हे सशस्त्र वीरा, तूं कोण ?

मनु : आर्य जातीचा अधिपति राजा मनु, महर्षींच्या चरणीं अभिवादन करीत आहे.

ऋषि : राजा ! मी तुला ओळखतों. ही सारी पृथ्वी तुझ्या अनिद्र तरवारीच्या आधीन आहे. या सृष्टीच्या शिखरावर सूर्याच्या तेजानेंच तुझा जन्म झाला. तेजोमय उत्तर ध्रुवाच्या ज्या

पान क्र. ०४

 

अंतरिक्षावर सकाळचीं पहिलीं किरणें उतरतात व जिथें देदीप्यमान् उषा नृत्य करतात, तिथे हा घन-गर्जनकारी अतिविशाल असा आर्क्टिक महासागरच तुझ्या जन्माचा साक्षीदार. तिथे नवीन रचनेने मानवजातीच्या भविष्यकाळाची निर्मिति करणें हीच तुझी नियति होती.

प्रचंड गिरि-शिखराप्रमाणेच, हिममय प्रदेशाच्या हे रक्षका ! या ध्रुवप्रदेशांत जेव्हा प्रकाश मंदपणे प्रकाशत होता व नंतर जेव्हा एखाद्या हिंसक पशुप्रमाणे हळू हळू येऊन स्वत:च्या निःस्तब्ध गतीने, अंधःकार मनाला आशंकित करीत होता, तेव्हा या दोन्ही अवस्थांमध्यें सुषुप्त राहूनहि मीं तुझें रक्षण केलेलें आहे. राजन्, तुझें अभीष्ट माझ्या दृष्टीआड झालेलें नाही. भगवंताशीं प्रेमसंभाषण केलेल्या पृथ्वीवर मानवाचीं युगयुगांतरें सामसुमीचीं गेलीं. आपल्या सत्तेच्या ज्या सर्वोच्च शिखरांवर परमेश्वराचें

पान क्र. ०५

 

अधिष्ठान आहे तेथें विचारांना मनाई आहे. मृत्यूने त्यांच्यावर प्रभुत्व गाजवून या आर्क्टिक प्रदेशाप्रमाणे त्यांनासुद्धा प्रसुप्त करून ठेविलें आहे. या तिमिराच्छन्न युगांत पापसंतप्त, असहाय मानवतेसाठीं त्या विलुप्त प्रकाशाचें संधान करण्यासाठींच तुझा पुनर्जन्म झालेला आहे. हे राजा, मीं सुद्धां कालाच्या जबड्यांत, मानवसंहाराच्या रणांगणांत, सैन्यांच्या प्रलयनिनादांत व तुफान वादळांमध्यें प्रकाशाचा शोध करण्याचा प्रयास करून पाहिला, झोपेंत व जागेपणीं मी कर्म, विवेचना व शांति यांच्या उपयोगाबद्दलही शंका व्यक्त केली होती. परंतु त्यामुळें माझी तृप्ति झाली नाहीं व गंभीर चिंतनानेंसुद्धां मला संतोष झाला नाहीं. कारुण्याचें माधुर्यसुद्धां फिकें वाटूं लागलें व माझा संकल्पही दृढ राहिला नाहीं. एखादा क्षण त्याची प्राप्ति मलाही होई व मी चकित होऊन जाई. परंतु पुन्हां तो माझ्यापासून दूर जात असे व त्याचा आनंद किंवा

पान क्र. ०६

 

शक्ति मी माझ्या मानव बंधूंसाठीं ठेवूं शकत नसे. सौंदर्यांतही मनाला कांहींच आकर्षण राहिलें नाहीं व त्याची चमक पाहून मला नेहमीं सूर्यालाही आलोकित करणाऱ्या त्या परमज्योतीचें केवळ स्मरणच होत असे. गुलाबाचा मोहक मनोहर वास सुद्धां मला आकर्षित करूं शकत नव्हता. क्लान्त होऊन मी जणूं काय विक्षिप्तच बनलों व सूर्य, चंद्र, तारे यांना सुद्धां कंटाळून गेलों. माझें हृदय निराश झालें व विमूढतेच्या त्या धगधगणाऱ्या ज्वालेपासून मुक्त होण्यासाठींच मी या पर्वतशिखरांचा व हिमसागरांचा आश्रय घेतला.

या अति उज्ज्वल हिमराशींनी विनम्रतेचा धडा शिकवून, माझी व्याकुलता दूर केली. इथें येऊन अहंकारापासून माझी मुक्तता झाली व मनाचे संकल्प-विकल्पही मिटून गेले. माझें अंतःकरण बर्फाप्रमाणेंच प्रशांत, पवित्र व निःस्तब्ध झालें.

पान क्र. ०७

     

      मनु : आपण तर महाधनुर्धर व महारथी होतां. असें असतांना आपणासारख्याला या मूक, अचल, श्वेत टेकड्यांमध्यें मानवतेपेक्षांही भारी असें कोणतें रहस्य आहे ? अशी कोणती सत्ता आहे ? गांवें आणि नगरें यांमधील गर्दीगोंधळांचा धीरगंभीर कोलाहल, उन्हाळा व पावसाळा हे ऋतु, कलशांतून पाणी आणणाऱ्या खेड्यांतील मुली, गुराख्यांनीं बासरींतून काढलेल्या ताना, प्रसन्न गाई आणि पक्ष्यांचा मधुर कलरव इत्यादि सारें या टेकड्यांहून अधिक मार्मिक व हृदयस्पर्शी नाहीं का ? इथे रात्रंदिवस जडता व मृत्यु यांचा भयानक शुकशुकाट याखेरीज आणिक विशेष असें आहेच काय ?

ऋषि : अनेकांचे शब्द ऐकणाऱ्याच्या कानांवर पडून मनाला विक्षिप्त करून टाकतात आणि तो एकमेवाद्वितीय असा परमेश्वर नीरव आहे. या हिमराशीवर त्याच्याच पावलांची निःस्तब्ध चाहूल ऐकूं येते.

पान क्र. ०८

 

मनु : तर मग हिमप्रदेशाच्या या भयानक खडकांमधून आपण कसलें वैभव गोळा केलें ?

ऋषि : राजा, येथें येऊन मृत्यूची भीति नष्ट झाली व एका गुह्य शक्तीनें मला उंच उंच नेलें आहे. वासनांच्या मनोहर बंधनांमधून मुक्त होऊन माझा आत्मा परमेश्वराच्या शोधांत, उडत असणाऱ्या ग्रहमंडलापेक्षाही वर गेलेला आहे.

मनु : तर मग आपल्याला साक्षात्कार झाला ? मार्गांतल्या कुठल्या प्रज्वलित क्षेत्रांत आपण त्याचा अनुभव घेतला ?

ऋषि : आकाशांत विहार करीत भगवंताच्या लोकांकडे जाणाऱ्यांना त्याचा पत्ता मीं विचारला होता.

मनु : काय, यशस्वी शनि, तसेंच त्याच्या रंगीत मंडळांनीं आपणाला मार्गदर्शन केलें ?

ऋषि : सूर्यसुद्धां कांहीं दाखवूं शकला नाहीं

पान क्र. ०९

 

व ग्रहांनाही स्वत:च्या प्रकाशाच्या उगमाचा पत्ता नव्हता. मी परलोकांतही गेलों. बाहेरील शून्याचेंही निरीक्षण केले. पण कुठेंच कांहीं कळेना. काळाच्या संकीर्णतेच्या पार होऊन मी शेषशायी भगवंताच्या क्षीरसमुद्रातही जाण्याचा प्रयत्न केला. पण तिथें तर काळाची गतिच स्तब्ध व स्थानाचा आदिसुद्धा विस्मृत आहे; तेव्हां मग मी, जिथे अजरामर देवगण सहज सुखांत देदीप्यमान आहेत अशा लोकांत परतलों.

मनु : मग देवतांनीं कांहीं सांगितले ? वरुणाला त्या देवाधिदेवाचें दर्शन घडलें आहे कां ?

ऋषि : जे पापांनीं स्तंभित होतात व दुःखाच्या गोष्टी ऐकून हर्षित होतात त्यांचे हाल काय वर्णावे ?

मनु : मग त्यानें आपल्या मदतीसाठी सानंद देवदूत नाही पाठविले ?

पान क्र. १०

 

ऋषि : त्याच्या भृकुटीनें भयभीत व स्वत:च्या विश्वासात आबद्ध अशा देवदूतांनाही त्याचा पत्ता नाहीं.

मनु :  मग काय, जिथें त्या चिरंतन ज्योतीचें दर्शन होऊ शकेल असा लोकच अस्तित्वांत नाहीं काय ?

ऋषि : त्रिदेवांच्या लोकांच्या दारावरही तेजस्वी सत्तांचा पहारा असतो. मी या दिव्य प्रदेशांची व शिखरांची सफर केली व विष्णुलोकाच्या विशाल प्रेमधामांतही प्रवेश केला.

मनु :  तो शांताकार, नीलवर्ण, मंगलमय विष्णु म्हणजेच तर परमेश्वर नव्हे ?

ऋषि : अं हं. आणि जल-स्थल-आकाशाचा स्वामी ब्रह्मदेवही तो परमेश्वर नाहीं.

 

मनु : मग काय ? परमेश्वर म्हणजे निव्वळ स्वप्न आणि कल्पनाच म्हणावयाची का ?

पान क्र. ११

 

ऋषि : मी शिवाच्या कैलासावरही गेलों होतों. पण तिथल्या चंचल भुतांनीं तर मला आंतच ढकलून दिलें.

मनु : तो तर अशरणशरण शिवच आहे ना ?

ऋषि : सत्तेच्या जाज्वल्य शिखरांवर शिवच विराजमान आहे.

मनु : वासना आणि व्यथा यांच्यापासून मुक्त होण्याचें रहस्यसुद्धां शिवालाच ठाऊक असेल. नाहीं ?

ऋषि : नीरवतेमध्यें अगदी शेवटीं त्याच्याच प्रशांत गंभीर वाणीचा झंकार ऐकू येतो.

मनु : तर मग आपल्यालाही नीरवतेमध्येंच प्रवेश करावयाचा आहे ?

ऋषि : ज्या मंदिरांत त्यानें भगवंताची प्रतिष्ठापना केलेली आहे तें आपलें खरें घर येथेंच आहे.

पान क्र. १२

 

मनु : तर मग आपली ग्रहमंडळाची यात्रा व्यर्थच झाली म्हणायची. आपण शून्याचें पर्यटन निरर्थकच केलें ना ?

ऋषि : राजा असें म्हणूं नकोस. मला ठाऊक झालें कीं, ज्याला दुःखदायी बंधन समजून आपण धावपळ करतों, तोच परमेश्वराचा चिरवांछित बाहुपाश आहे; त्याच्याच सत्तेनें, या पृथ्वीची उत्पत्ति कां झालेली आहे तेंही मीं पाहिलें. आपला प्रादुर्भाव ज्याच्यामधून झाला, तसेंच जें आपलें स्वरूप आहे त्या सत्यं, ऋतं, व बृहत् चें दर्शनही मीं घेतलें. गेलेल्या युगांची कहाणी मीं त्याच्याकडून ऐकली व शक्तीच्या अरूपांतून ज्या मंत्राद्वारें या सौर मंडलांची सृष्टि केली गेली, त्याचें ज्ञानही मला प्राप्त झालें. राजन्, काळाची गति व स्थानाची असीमता यांमध्येंही एक छंद आहे व जोंपर्यंत आपण आजच्या या वेड्यावांकड्या बेसूर सुरांना पूर्ण रागिणीमध्यें परिणत

पान क्र. १३

 

करणार नाहीं, तोंपर्यंत आपल्याला याच हिरव्यागार पृथ्वीवर येऊन त्याच छंदाला साधावयाचें आहे.

मनु : तर मग ही पृथ्वी हेंच त्याचें सिंहासन व हेंच दुर्बल मानवशरीर हीच त्याची दीन कुटि आहे का ?

ऋषि : शरीर तर जड आहे. मी जडाला जीर्ण वस्त्राप्रमाणें काढून फेकून दिलें आहे.

मनु : या शरीराच्या मागें अवस्थित अशा ज्या प्राणशक्तीची ऋषींनी चर्चा केलेली आहे तोच परमेश्वर कां ?

ऋषि : मानवामध्यें प्राणसुद्धा वायुप्रमाणे चलायमान आहेत.

मनु : तर मग सुख-दुःखाचें अधिष्ठान मन, हेंच तर परमेश्वर नव्हे ?

पान क्र. १४

 

ऋषि : मन म्हणजे नामरूपांना अंकित करण्यासाठीं व त्यांना नष्ट करण्यासाठीं त्या भगवंताच्या हातचें बाहुलें आहे.

मनु : ज्याच्या अमर दृष्टीला काळ सुद्धां धुंद करूं शकत नाही तो परमेश्वर म्हणजे चिन्तन तर नसेल ना ?

ऋषि : राजा ! त्याच्या मौन वाणीनें मला चिंतनाच्या स्पष्ट स्वप्नांच्याही वर उठण्याचा आदेश दिला. जाज्वल्यमान निगूढाच्या तळाशीं व विषयांच्या नीरव गहनगूढामध्यें जेथें नाहीं वीणेचा झंकार आणि नाहीं गायनाचा स्वर; नाहीं इथल्यासारखा प्रकाश आणि अंधार वा नाहीं विजेचा चकचकाट; किंवा घनगर्जनासुद्धां ! शुभ्र प्रज्वलित आनंदाच्या स्थिर, अगाध आणि मौन अंतःस्थलांत, हृदयाच्या विशाल केंद्रांत तसेंच स्वर्गाच्या दिव्य गुहेंत, आपणा सर्वांमध्येंच

पान क्र. १५

 

त्याचें अधिष्ठान आहे. तसेंच तो आपणां सर्वांहून अतीत सुद्धां आहे.

मनु :  हे महर्षे, सूर्यासारख्या ज्वलंत अशा आपल्या या विचारांचें अवलोकन करण्याला सुद्धां जर आमची दृष्टि असमर्थ आहे, तर मग ज्या चिरंतनाच्या कांहीं किरणांनींच हें अखिल विश्व आलोकित होतें, त्या बिकट अशा तेज:पुंजाला आम्ही कसें काय पाहूं शकणार ?

ऋषि : तर मग हे आर्या ! तूं आपल्या स्वत:कडेच पहा. तत्त्वमसि -- तूं सुद्धां तोच आहेस. मी किंवा तूं कांहींच नाहीं; पण हे जे मानव, वनांतले पशू आकाशांत उडणारे पक्षी, विषधारी सर्प आदि जें कांहीं सजीव दिसतें तें तें सारें म्हणजे त्याच्यावरील चालती-फिरती छाया मात्र आहे. आपण स्वत:चीच घृणा बाळगतों व आपला स्वत:चाच संहार करण्यासाठीं, तसेंच स्वतःकडूनच संपत्तिरूपी छायेचें अपहरण

पान क्र. १६

 

करण्यासाठीं अपार कष्ट व घोर परिश्रम करतों. आपली स्वाभाविक प्रेरणा, तसेच स्वस्वरूपाची जाणीव देणाऱ्या वीणेचा झंकार किंवा क्षुब्ध सागराच्या गगनभेदी गर्जनाही आपण या कोलाहलांत क्वचितच ऐकूं शकतों. नाना दिशांना भटकणाऱ्या आपल्या मनावर तऱ्हेतऱ्हेच्या छाया पडतात व नष्ट होतात व या छाया फक्त छायाच दिसतात. वर, खालीं तसेंच चारी बाजूला केवळ निरर्थक छायेचें अवडंबर मात्र आहे; आणि ज्योतिर्मयावर आपल्या अर्धवट ज्ञानाची छाया टाकणाऱ्या या क्षणभंगुर आकृत्यांना, त्याच्याच हृदयीं असलेला तो सर्वशक्तिमान् अज्ञेय परमेश्वर, आपल्या संकेतानेंच पुतळ्याप्रमाणें नाचवून मौज पहातो.

मनु : हाय ! म्हणजे मानव-जीवन ही एक विटंबनाच समजावयाची का ? यौवनाची ही कमनीय चपलता, मृगलोचनांचें व कुलांगनांचें

पान क्र. १७

 

भुवन-मोहन सौंदर्य कीं ज्याच्यासमोर आकाशांतील वारे सुद्धां फिके वाटू लागतात.

विद्वानांचें गंभीर चिंतन, रणचंडीचें शोणित-तर्पण, भीषण संघर्ष, मुठी मिटलेले मृत बाहू, दूर दूरचे प्रवास व देशदेशांतरांच्या विविध योजना हें सारें म्हणजे काय फक्त त्या उदासीन द्रष्टयाला प्रसन्न करण्यासाठीं चालविलेले खेळच आहेत ? कुमुदिनी व गुलाबाचीं रंगीबेरंगी फुलें ज्याप्रमाणे कांहीं वेळ फुलदाणीमध्यें टवटवीत असतात, पण कोमेजल्यानंतर ती टाकून देण्यांत येतात, त्याप्रमाणें मनुष्याच्या भाग्यामध्यें सुद्धां चांगल्या व वाईट दोन्हींची एकच गति असते कीं काय ?

ऋषि : राजा, रूप किंवा वाणी यांपैकीं कांहींही निरर्थक नाहीं. सौरमंडळाचा भव्य परीघ व नाल्यांत वहात जाणारें गवत -मानवाच्या द्वारें प्रशंसित व तिरस्कृत - दोन्हींही शाश्वत भावना आहेत. महान् वा तुच्छ, दोहोंमध्येंही

पान क्र. १८

 

भगवंताचें चक्र अविराम गतीनें फिरतें आहे. राजा, कुठलीही भावना व्यर्थ नाहीं. इतकेंच काय पण आपल्याला जीं स्वप्नें पडतात त्यांतही सार आहे. आपल्या कल्पनेचा आलोकही त्या दूर असणाऱ्या ताऱ्यांमध्यें चमकत असतो.

मनु : तर मग स्वप्न आणि वास्तव दोन्हीं आपणच असतो ? दूर आणि जवळ आपण एकाच वेळीं असू शकतों ?

ऋषि : राजा, आपण स्वप्न नव्हे, तर स्वप्नदर्शी आहोंत व म्हणूनच आपण भितों व प्रयत्न करतों. कवींप्रमाणें आपणही नेहमीं भावनांच्या अलौकिक जगांत वावरत असतों व आपल्या स्वत:मधूनच त्या भावनांच्या रूपरेखा प्रस्फुटित व विकसित करतों. या भावना येथेंच निर्माण होतात व वाढतात. कवि प्रयत्नपूर्वक आपल्या विशाल मनामधून एका सजीव सृष्टीची रचना करतो व त्याची ही सृष्टि विश्वांत व्याप्त

पान क्र. १९

 

होऊन राजा-रंक, बालक-बालिका, शत्रु-मित्र इत्यादि अनेक रूपांमध्यें प्रेम व द्वेष, हर्ष व विषाद तसेंच भोग, संघर्ष आणि गडबड-गोंधळ यांची एक वावटळच निर्माण करते. याप्रमाणेंच भगवंतसुद्धां आपल्या या सर्व प्राणिमात्रांत कविमनाचा कांहीं अंश टाकून देतो व मग तो कवि या लीलेच्या उपसंहारापर्यंत, या ज्वलंत प्रेरणेला वश होऊन, स्वतःच्या स्वरूपाला विसरून, आपल्या या सृष्टींतच गोंधळून जातो; व जोंपर्यंत नभोमंडलांत ग्रहाची परिसीमा निश्चित होत नाहीं, पृथ्वीवर हिरवीगार शेतें, हिमाच्छादित ध्रुवप्रदेश तसेंच सुविस्तृत महासागरांची व्यवस्था कायम होत नाहीं आणि हा भू-स्वर्ग नाना दृश्यें व मधुर राग-रागिण्यांनीं परिपूर्ण होत नाहीं व येथें पशुपक्षी, तसेंच प्रेम व घृणा या प्रवृत्तींनी पूर्ण अशा मानवाचा प्रादुर्भाव होत नाहीं, तोंपर्यंत त्याचा (कवीचा) आत्मा वादळ व वावटळ यांची सृष्टि करीत, निरंतर

पान क्र. २०

 

याच विशृंखलतेंत फेऱ्या मारीत असतो; त्याच्या एकाच हुंकारानें पृथ्वी व स्वर्गलोकाची उत्पत्ति झाली. त्याचाच एक अंश असल्यामुळें हें सारेंच सत्य आहे, व नामरूपांमध्ये विस्मृत आत्मा आपल्या स्वरूपांत जागृत सुद्धां होतो, म्हणून हें सारें स्वप्नवत् सुद्धां आहे. परंतु हे राजा, कशालाहि व्यर्थ समजूं नकोस. अनेकानेक आवरणांमधून त्याचीच ज्योति चमकत असते. परमेश्वराचीं स्वप्नेंहि सत्य असतात व त्यांची सफलताही निश्चित आहे. अतएव हे राजा, सदैव परमेश्वराच्याच आश्रयाला राहून स्वत:ला उन्नत कर व मानवतेलाहि उन्नत कर.

मनु : हे महर्षे, मग काय ज्याप्रमाणें अगाध जलराशीमध्यें त्याच्याच आदेशावरून लाटा उठत असतात व मिटत असतात, त्याचप्रमाणे मानव किंवा इतरांमध्यें अंतर्हित राहून तोच सर्व कांहीं करतो कीं काय ?

पान क्र. २१

 

ऋषि : ठीक, त्याचेंहि रहस्य तुला सांगतों. आपल्या या प्रत्यक्ष जगांच्या मागें एक दुसरेंहि जग दडलेलें आहे व त्यांत आपलीं जागृत-स्वप्नें असतात. हीं स्वप्नें या प्रत्यक्ष जगाहून अधिक सत्य असतात व जोंपर्यंत आपण प्रत्यक्षांत गुंतलेलों असतों, तोंपर्यंत हीं स्वप्नें मिथ्या वाटत असतात. या स्वप्नांतून आपणाला हें मर्त्य जीवन तसेच भावना मिळतात व त्याचींच चंचल किरणें येथें सघन व साकार बनतात. तिथें हीं सारीं स्वप्नें एका जादूमय प्रवाहांतून वहात असतात स्वरांत स्वर मिळवून राग-रागिण्यांचा एक जणूं काय मायाबाजारच भरलेला असतो. नयनाभिराम सौंदर्यावर सुंदरतेचा एक ढीग सांचलेला आहे, आणि भावनांवर भावना येऊन अपरूप संगीतलहरीनीं नक्षत्रांचें जाळें विणलें जातें हाच तो स्वप्नलोक कीं ज्यामधून मानवजातीचा उदय झाला. शरीराच्या बंधनांत जखडले जाऊन नाना चिन्तांचा भार नित्य वाहिल्यामुळें, तिथला

पान क्र. २२

 

आनंद, सौंदर्य, संगीत आणि भावनांचा किंचित् असा अंशही प्रगट करण्यासाठीं आपल्याला घोर परिश्रम करावे लागतात. त्या दिव्य संगीतांतील एखाद्या स्वरावरही पूर्ण प्रभुत्व प्राप्त करून घेणें म्हणजे या पृथ्वीवर आपल्याला मिळणारें पारितोषिक होय व त्यामुळें त्या स्वप्नलोकांतील सुरांच्या विषमतेमध्येहि एक राग, तसेंच पूर्णतेचा एक झंकार ऐकूं येतो. थोडी विश्रांति घेऊन आपण पुन्हां पुढें सरकतों. आपल्या या दीर्घ यात्रेच्या पावलापावलाकडे उत्सुकतापूर्ण दृष्टीनें आपण पहात असतों; परंतु आपल्या परिश्रमांचें कांहीं फळ न दिसल्यानें क्रांति व विराम, संहार, संघर्ष, तसेंच संताप यांमधूनच हळू हळू आपली प्रगति होत असते.

एखादी नाव तुफान वादळामध्यें आपलें शीड उभारून किनाऱ्याला लागण्याची पराकाष्ठा करते. कधीं सागर क्षुब्ध होऊन गर्जू लागतो.

पान क्र. २३

 

कधीं वारा अनुकूल होऊन शांतपणें वहातो. मग संध्याकाळच्या धूसरपणांत किनारा दृष्टिआड होऊन जातो व इकडे समुद्रहि पुन्हां उग्र रूप धारण करतो.

आपलें हें जीवनहि अगदीं असेंच आहे. परंतु हें अगदीं निश्चित कीं, जोंपर्यंत आपलें ईप्सित, ध्येय प्राप्त होत नाहीं तोंपर्यंत ही महान् लीला आणि हे संघर्ष असेच चालत रहाणार. युगायुगांतरापासून चालत आलेली आपली ही नाव खडकावर आदळून किंवा भोंवऱ्यामध्यें सापडून बुडणारी नाहीं हें खास. म्हणून हे राजा ! तूं राजा म्हणूनच रहा, धीर धर. वादळ व वावटळींची पर्वा न करतां हंसत हंसतच या झंझावातांतून, घनगर्जनांतून व भोवऱ्यांजाळयांतून नित्य निरंतर पुढे आणि पुढेंच जात रहा. चितेमधून उठून, कबरींतून निघून, मागच्या आकांक्षा जमेस धरून भविष्य घडवीत, कांहीं

पान क्र. २४

 

मोडून तोडून तर कांहीं शिल्लक ठेवून, अपरिचित रागिण्यांचा शोध घेत, अर्धवट भावनांना पूर्ण करीत आणि आपल्या मनांतील अमोल कल्पनांना सजीव व साकार बनवीत, आपल्याला आपल्या ध्येयशिखरापर्यंत पोहोंचावयाचेंच आहे. तेव्हां कसलीहि शंका धरूं नकोस. आघातांनीं व्याकूळ होऊं नकोस आणि वादळतुफानांमुळें भयभीतही नको होऊस. राजा, दुःख व शोक म्हणजे आच्छन्न आत्म्याचा निव्वळ भ्रम मात्र आहे. त्यापैकीं कांहींही आपल्या अंतरात्म्याला स्पर्श करू शकत नाहीं आणि तोही त्याच्यावर कधीं दृष्टि टाकत नाहीं. परंतु असें असलें तरी कारस्थानें तिरस्कार, पराजय व विषाद यांच्यांतही त्याला एक रस व शक्ति मिळते. आनंदासाठींच त्यानें सृष्टींत अवतार घेतलेला आहे आणि जर त्या आनंदांत वेदनेचेही मिश्रण होत असेल तर तो त्या अंधाराचाच परिणाम कीं ज्याला आपण प्रकाश समजत

पान क्र. २५

 

असतों. राजन्, कल्पनातीत स्वप्नलोकांत फिरतांना समर्थ योगी हाच फक्त या रहस्याला जाणूं शकतो. परंतु हे स्वप्नलोक म्हणजेही फक्त छायाच आहेत. ज्यांचे अस्तित्व नाहीं परंतु आहे असें वाटतें अशा या छायांच्या मागें जी परम आनंदमय ज्योति आहे तीच यांची निर्माती आहे. हेच भिन्न मतमतांतरांचे स्वर्गलोक कीं जिथले निवासी सुख आणि आनंदांत निमग्न असतात. हीच ती टांकसाळ कीं, ज्यांची शेवटची आवृत्ती म्हणजे आपण मानव. आपण तिथल्या व्यवस्थेला इथे द्वद्वांच्या अक्षरांत अंकित करतों. या अमृत लोकांची जीवन-सरिता चिरंतन प्रकाश व स्वर्णिम वायूच्या लहरींतच वहत असते आणि तिच्या मुक्त प्रवाहांत वेदनेची बाधा नाहीं आणि हर्षाचा थरकांप नाहीं. तेंच आपलें स्वत:चें घर व तीच आपल्या हृदयांतली अंतरतम अभीप्सा. परंतु या दिव्य लोकांचे अधिकारी त्यांच्या स्वर्णद्वारांत तेव्हांच घुसूं देतील की जेव्हां

पान क्र. २६

 

आपलें मन पूर्णपणें स्तब्ध होईल व रक्तमांसाच्या या शरीरापासून आपली मुक्तता होईल. या दिव्य लोकांना पृथ्वीवर उतरविण्यासाठींच आपला जन्म होतो व या जीवनांतच त्यांच्या कांहीं भागांवर आपण प्रभुत्व मिळवूं शकतों. मधून मधून प्रकाशयुगें येत असतात व कांहीं कांहीं चांगल्या शुभ मुहूर्तावर आपण त्या स्वर्गलोकांतल्या दिव्य विभूतींना या पृथ्वीवरसुद्धां उतरलेल्या पहातों आणि तेव्हांच मानवतेला बरोबर घेऊन आपण आनंदमय प्रेमाचे परमधाम जो ज्योतिर्मय परमेश्वर त्याच्यापर्यंत पोहोंचण्याला समर्थ होतों. आपल्या सर्व दुर्बळता, दोष व दुःखें असतांनाही आपण निरंतर त्याच्याकडेच जात आहोंत परंतु तो स्वतः या स्वर्गलोकांहूनही पलीकडेच आहे; आज आहे आणि त्याच्या सुखभोगांचा नाश झाल्यावरही राहील. हे राजा, या सुद्धां छायाच आहेत व ज्या तेजामधून यांचा उदय होतो, त्यांतच त्यांचा अंतही पण होतो.

पान क्र. २७

 

आपणही त्याच पूर्णातिपूर्ण ज्योतीचे स्फुल्लिंग आहोंत. त्याच महासागराच्या लाटा आहोंत. त्यांतूनच आपला जन्म, त्यांतच आपल्याला विलीन व्हावयाचें, तेंच आपलें चिरईप्सित, त्याच्याच इच्छेनुसार आपला जन्म होतो व होत

राहील.

म्हणून, हे राजा, जीवनाचा संकोच करूं नकोस व जोपर्यंत या जीवनापासून निवृत्त होण्याची आज्ञा वा आदेश तो देत नाहीं तोंपर्यंत त्यानें दिलेल्या या पापपुण्याचा, या भल्या-वाईटाचा सुद्धां त्याचें वरदान समजून प्रसन्नतापूर्वक स्वीकार कर. जोंपर्यंत हें जीवन आहे तोंपर्यंत त्याला त्या भगवंताचे नाटक समज. पृथ्वीला या नाटकाची रंगभूमि व स्वतःला केवळ एक नट समजून आपला अभिनय निपुणतापूर्वक करीत रहा. कर्म कर, प्रेमही कर आाणि ज्ञानसुद्धां प्राप्त करून घे. तरच तुझा आत्मा शाश्वत आनंदाचा

पान क्र. २८

 

अधिकारी होईल. माणसावर प्रेम कर व भगवंतावरही प्रेम कर. प्रेम करावयास भिऊं नकोस व सुखोपभोगांनाही डरूं नकोस. मृत्यु म्हणजे फक्त एक दरवाजा व दुःख, शोक ही अज्ञान्यांना उद्विग्न करणारी एक कल्पनाच आहे. अहंकारापासून मुक्त होऊन प्रेमांतच उच्चतर आनंद मिळव.

मनु : हे महर्षे ! माझे साम्राज्य विस्तृत आहे. सारें भूमंडळ माझ्या आज्ञेंत वागतें व या सूर्यमंडळाच्याही पलीकडे असणाऱ्या स्वर्गलोकांची स्वर्णिम दृष्टि माझ्यावर आहे. परंतु मला तर त्या पूर्ण व प्रशांत ‘एकमेवाद्वितीयम्’चीच इच्छा आहे. किरणांचा नव्हे पण सूर्याचा शोध मी करतों आहे.

ऋषि : तर मग पृथ्वीवरच त्याला शोध. आपल्या ध्येयाकडे मानवसाधनेच्या सफलतेसाठीं त्यानें या विविध लोकांत एक महान् राष्ट्राच्या

पान क्र. २९

 

संघटनाचा भार तुझ्यावर सोपविला आहे. आपल्या सामर्थ्याची सिद्धि मिळव व मानवतेलाही परिपूर्ण कर. राजा, तत्त्वमसि, तूं तोच आहेस. तुझ्या स्वतःच्याच मर्जीनें तुझ्या आत्म्यावर जें अंधाराचें आवरण पडलेलें आहे, तें दूर करून आपल्या स्वरूपाची पूर्णता व प्रशांति यांना पुन्हां मिळव व प्रेमातुर मानवालाही त्याचें आराध्य जें परमेश्वर त्याच्यापर्यंत पोहोंचव.

**

पान क्र. ३०

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates